सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

बोधकथा : जसे कर्म तसे फळ

बोधकथा :  जसे कर्म तसे फळ

आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जो दानधर्म केला जातो, तो प्रामुख्याने ब्राह्मणास! दान हे नेहमी सत्पात्री दान घडावे. असा दानाचाही एक नियम आहे. याचा दुसरा अर्थ असाही होतो की, ज्या ब्राह्मणाला दान देऊन पुण्य पदरी जोडायचे, तो ब्राह्मण कसा असावा, ह्या गोष्टीचा विचार व्हायला हवा. आता हा ब्राह्मण कसा असावा, त्याने काय करावे, काय करू नये, ह्या संदर्भात पद्मपुराणात एक कथा आहे. ती अशी आहे ब्राह्मण हा ज्ञानी, शांत स्वभावाचा, अल्पसंतुष्ट अन् विनयशील असावा.


तो अहंकारी, गर्विष्ठ, दांभिक अन् लोभी असू नये. ब्रह्म जाणणारा, भगवत् भजन-पूजन करणारा असावा. तसेच ब्राह्मण हा क्षात्रधर्मीय किंवा वाणिज्य वृत्तीचाही असू नये. ब्राह्मणाने सावकारी करू नये. उधारी करू नये. कर्ज घेऊ नये. घेतल्यास ते त्वरित फेडावे. तसेच त्याने कुणास जामीनही राहू नये. कारण ह्या जन्मी आपण जसे कर्म करतो, त्याचे भले बुरे फळे आपल्याला पुढच्या जन्मी भोगावे लागते.


त्याच संदर्भात ही एक सूचक कथा जयसिंह नावाचा एक मनुष्य एकदा व्यापार-धंदा करण्याच्या उद्देशाने जवळच्या राज्यात गेला. तेथे उत्तम प्रकारचा व्यापार करून तो परत येत असताना जंगलात एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. त्याने जवळच्याच ओढ्यावर हात-पाय धुतले. एका झाडाच्या सावलीत बसून भाजी-भाकरी खाल्ली.


थोडी विश्रांती घ्यायला तो आडवा झाला, तर नकळत त्याला डोळा लागला. थोड्या वेळाने जाग आली. पल्ला खूप लांबचा होता, म्हणून तो तातडीनं उठला. घोड्यावर स्वार झाला अन् पुढे निघून गेला. मात्र काय झालं, त्या घाई-गडबडीत तो आपलं धनाचं गाठोडं तिथंच विसरला. जयसिंह व्यापारी पुढे निघून गेला अन् – थोड्याच वेळांत तिथे रमणलाल नावाचा एक मनुष्य आला. त्याने त्या झाडाखालीच जरा बसायचा विचार केला, तोच त्याला तिथे ते धनाचे गाठोडे दिसले. त्याने प्रामाणिकपणे इकडे-तिकडे त्या गाठोड्याचा कुणी मालक मिळतोय का, मिळतोय का; म्हणून थोडी वाट पाहिली. मात्र कुणीच आलं नाही.


मग त्यानेच ते अचानक झालेल्या धनलाभाचे गाठोडे उचलले अन् तो सरळ आपल्या मार्गाने निघून गेला. रमणलाल निघून गेला अन् त्याच जागी गंगाराम नावाचा आणखी एक प्रवासी येऊन थांबला. त्याने त्याच झाडाखाली बसून आपली शिदोरी सोडली आणि तो भाजीभाकरी खाऊ लागला. त्यानं पहिला घास तोंडात घातला असेल-नसेल; तोच पहिला प्रवासी म्हणजेच, तो जयसिंह नावाचा व्यापारी तिथे परत आला. त्याने गंगारामकडे तिथे विसरलेल्या गाठोड्याबद्दल विचारणा केली.


गंगाराम म्हणाला, “नाही बाबा, मी तर इथं आत्ताच आलो आहे. मला काही इथं कसलंच गाठोडं सापडलं नाही.” पण जयसिंहाला गंगारामचे ते बोलणे खरे वाटेना. त्याला अस वाटू लागल की, हा खोट बोलतोय. तेव्हा जयसिंहाने गंगारामला दम दिला, त्याला धमकावले; पण तो ‘नाही नाही, मला काहीच ठाऊक नाही’, असं म्हणत होता. पण जयसिंहाचा काही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. उलट सत्य काय, हे जाणून घ्यायचं म्हणून, तो चक्क गंगारामला मारहाण करू लागला.


तेव्हा मात्र खरोखरच निरपराध, खरे असलेल्या गंगारामच्या अंगावर मात्र तडाखे बसू लागले. तो कळवळू लागला. देवाचा धावा करू लागला की, “देवा नारायणा, अरे धाव–मला वाचव, माझं रक्षण कर.” नेमके त्याच वेळी नारदमुनी आकाशमार्गाने तिथूनच चालले होते. त्यांनी तो झाडाखालचा प्रकार पाहिला आणि त्यांना नको ते तडाखे खाणाऱ्या गंगारामबद्दल दया आली. ते लगेच वैकुंठात नारायणाकडे गेले.


तेथे भगवंतांची भेट घेऊन त्यांना विचारले की, “देवा, भक्तरक्षण करणे, हे तुमचे ब्रीद आहे ना? मग तो तुमचा भक्त तुमच्या नावाने टाहो फोडतोय, तरी तुम्ही त्याच्या सोडवणुकीसाठी का बरं जात नाही?” तेव्हा भगवान नारायण हे नारदाला म्हणाले, “त्याचं काय आहे नारदा, हा त्या गंगारामचा कर्मभोग आहे, जो जसं काम करतो, त्याच्या पदरात तसंच फळ पडतं.. “आता निरपराधी असूनही ज्या गंगारामला निमूटपणे मार खावा लागतो आहे, कारण तो गतजन्मीचा कर्जदार आहे, त्याने तेव्हा कर्ज बुडविले होते.


“ज्याला अचानक धन मिळाले, तो प्रवासी म्हणजेच रमणलाल हा गतजन्मीचा सावकार होता. ज्याने कष्टाने कमविलेले धन लुटले गेले, तो गतजन्मीचा गंगाराम याचा जामीनदार होता. कर्जदाराने कर्ज फेडले नाही, म्हणून त्याला मार खावा लागला. जामीनदाराला ते कर्ज असं सावकाराला फेडावं लागलं. नारदा! कर्ज आणि हत्या ह्याच्यातून कुणीच सुटत नाही. हे तिघे तर मागच्या जन्मी ब्राह्मण होते.”


तात्पर्य : जसे करावे तसे भरावे लागते. कर्ज जर फेडण्याची ऐपत नसेल, तर कर्ज काढू नका. 

स्त्रोत : इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा