श्रावण बाळ
अयोध्येचा राजा दशरथ. तो एकदा शिकारीला गेला. दिवसभर फिरला. त्याला शिकार मिळाली नाही. रात्र झाली. दशरथ राजा झाडावर बसला. शिकारीची वाट पाहू लागला. बुडबुड असा आवाज झाला. दशरथाने बाण सोडला. “आईगऽ मेलोऽ” असा – आवाज ऐकू आला. दशरथ राजा झाडाखाली उतरला. तळ्याकाठी गेला. तेथे एक मुलगा पडला होता. दशरथाचा बाण त्याला लागला होता. “बाळा कोण रे तू ?” ” माझे नाव श्रावण.” “इथे कशाला आला होतास?” श्रावण बाळ विवळत होता. तो कण्हत कण्हत म्हणाला, “मी आहे श्रावण बाळ. माझे आईवडील म्हातारे आहेत. आंधळे आहेत. आम्ही काशीयात्रा करून आलो. त्यांना खूप तहान लागली. मी पाणी घेण्यास इकडे आलो. पण -अरेरे ! राजा, हे पाणी घे. माझ्या आईवडिलांना दे. त्यांना माझा नमस्कार सांग.” श्रावण बाळ गेला.
दशरथाने झारी घेतली. तो हळूहळू चालू लागला. श्रावणाचे आईवडील होते तेथे तो गेला. पावले वाजली. म्हातारा म्हणाला, “आलास बाळ? बोलत का नाहीस? रागावलास का? किती रे कष्ट घेतोस! आमची सेवा किती करतोस!” दशरथ राजा म्हणाला. “आई, बाबा, आधी हे पाणी प्या.” दशरथाचा आवाज ऐकला, म्हातारा दचकला, तो म्हणाला, “तू कोण? आमचा बाळ कोठे आहे?” ” मी दशरथ राजा आहे. माझ्या हातून बाळ मारला गेला.” ते ऐकताच, ती दोन म्हातारी माणसे धाडकन जमिनीवर पडली. मरता मरता म्हणाली, ” राजा दशरथा, आमचा घात केलास ! आम्ही पुत्रशोकाने मरत आहोत, तसा तू ही ‘पुत्र पुत्र’ म्हणत मरशील. मुलाचे नाव घेत घेत जाशील दशरथ अयोध्येला परत आला. त्याने वसिष्ठ गुरुजींना सांगितले. वसिष्ठ म्हणाले, “ठीकच झाले. तुला मुलगा नव्हता, तो आता होईल. तू यज्ञ कर ! देवाची सेवा कर ! हा शाप तुला वरदान ठरेल.”
तात्पर्य
१) कोणतेही काम करताना न बघता करू नये, त्याचे दुष्परिणाम स्वतःबरोबर इतरांनाही भोगावे लागतात.
२) आपल्याकडून झालेल्या चुकांची कबुली देऊन शिक्षा भोगण्यास तयार राहावे, शिक्षा भोगताना पुन्हा ती चूक न करण्याचा निश्चय करावा.
स्त्रोत : इंटरनेट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा